मुंबई | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा झाले आहेत. तर लवकरच 13 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो. परंतु अद्याप पंधरवडा उलटला असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. त्यामुळे 13 व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे.
‘या’ महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार 13 वा हप्ता
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची मदत जमा होते. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळाले असून लवकरच 13वा हप्ताही बँकेत वर्ग होणार आहे. यापूर्वी, 17 ऑक्टोबर 2022 रोजी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. आता 13 वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता डिसेंबर 2022 पासून मार्च 2023 पर्यंत हस्तांतरित केला जाणार आहे. दरवर्षी चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये वर्ग केले जातात. आता पुढच्या 13 व्या हप्त्याचे सर्व पैसे 17 फेब्रुवारीपर्यंत हस्तांतरित केले जाऊ शकतात असं सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना eKYC आणि रेशन कार्ड क्रमांक अपडेट करण्याचे आवाहन
नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी 15 ते 20 डिसेंबर दरम्यान शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं अद्याप 13 व्या हप्त्याबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्यावेळी 11 वा हप्ता जमा झाला होता, त्यावेळी अनेक ठिकाणी फसवणुकीची प्रकरणं समोर आली होती. अनेक मृत शेतकरी, अपात्र शेतकरी, सरकारी कर्मचारी, श्रीमंत कुटुंबातील लोक यांच्या खात्यावर देखील पंतप्रधान किसान योजनेचे पैसे जमा झाले होते. त्यानंतर सरकारने ई-केवायसी, जमीन रेकॉर्ड पडताळणी आणि आता शिधापत्रिका क्रमांक सादर करणे अनिवार्य करण्यात केले आहे. दरम्यान, 13 वा हप्ता जमा हण्यापूर्वीचं शेतकऱ्यांनी आपली eKYC तसेच रेशन कार्ड क्रमांक अपडेट करावेत असे आवाहन करण्यात आलं आहे.