समाजकल्याणची भरती रखडली, अर्ज भरून सात महिने उलटले तरी अद्याप परीक्षेची तारीख नाही; विद्यार्थी हवालदिल | Samaj Kalyan Vibhag Bharti

Share Me

मुंबई | समाजकल्याण विभागातील भरती मागील बऱ्याच दिवसांपासून रखडलेली आहे. भरतीची जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर (Samaj Kalyan Vibhag Bharti) मात्र यासंबंधीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

समाजकल्याण विभागात तब्बल 12 वर्षानंतर गट ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील 81 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी मे 2023 मध्ये अर्जही भरून घेण्यात आले. मात्र, सात महिने उलटले तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) परीक्षेच्या तारखे संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.

त्यातही 2024 च्या परीक्षांच्या वेळापत्रकात समाजकल्याणाच्या भरतीला स्थान नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. मे महिन्यात समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी, गृहप्रमुख या अधिकारी पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी एमपीएससीकडून काढण्यात आलेल्या अपुऱ्या जागांवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील टीका केली होती. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्र राजपत्रित नागरी जाहिरात(274 पदे)प्रसिद्ध झाली परंतु सामान्य राज्यसेवा मध्ये एकूण 35 संवर्गापैकी केवळ 12 संवर्गाची अत्यंत कमी पदांसह जाहिरात आली.

DC, Dysp, ACST, CO , education officer, तहसीलदार सारखी पदे राज्यसेवेत असतात याचा सरकारला विसर पडला आहे का? लाखो पदे रिक्त असताना केवळ 205 पदे म्हणजे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे. ताबडतोब सर्व 35 संवर्गाचे सर्वसमावेशक मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश द्यावेत.स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये देखील 5 पैकी फक्त 2 संवर्ग केवळ 26 पदासह प्रसिद्ध केले. इतर 3 संवर्ग गायब करण्याचे कारणच काय? या सर्व तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे त्यांनी बंड पुकारून रस्त्यावर उतरण्यापूर्वी सर्व विभागांना @mpsc_office कडे त्वरित मागणीपत्रक पाठवण्याची कार्यवाही अपेक्षित आहे, असे नाना पटोले म्हणाले होते.


Share Me