तलाठी भरतीतील ‘पेसा’चा पेच कधी सुटणार? Talathi Bharti 2023

Share Me

पुणे | राज्यात भूमि अभिलेख विभागाच्या वतीने पार पडलेल्या तलाठी भरती (Talathi Bharti 2023) संदर्भात ‘पेसा’चा पेच कायम आहे. अधिसूचित केलेल्या क्षेत्रांतील गावातील सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) या आरक्षण प्रवर्गात असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी आरक्षण देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यातील तलाठी भरतीबाबत काय निर्णय घ्यायचा असा पेच भूमी अभिलेख विभागासमोरआहे.

सध्या तलाठी भरती परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी घेतलेल्या हरकती, आक्षेपांचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तूर्त याबाबत थांबण्याची भूमिका घेण्यात आली आहे. बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेसाठी तब्बल साडेअकरा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती 4466 जागांसाठी दहा लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली.

तलाठी भरतीसाठी मोठय़ा प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार 17 ते 22 ऑगस्ट पहिला टप्पा, 26 ऑगस्ट तेे 2 सप्टेंबर दुसरा टप्पा आणि 4 ते 14 सप्टेंबर असा तिसरा टप्पा पार पडला. यामध्ये एकूण परीक्षेची 57 सत्रे झाली. या सत्रांत विविध प्रश्नपत्रिकांमधून साडेपाच हजारांपेक्षा अधिक प्रश्न विचारण्यात आले होते. परिक्षा पार पडल्यानंतर उमेदवारांकडून हरकती, आक्षेप नोंदविण्यात आले असून त्यावर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्यात आदिवासींची धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य पुन्हा टांगणीला लागले आहे. या प्रकरणाची 5 डिसेंबरला सुनावणी होणार होती. मात्र यादिवशी कोणतीही सुनावणी न झाल्याने 9 जानेवारी 2024 पर्यंत यााबाबतची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

प्रश्नपत्रिकांमध्ये तब्बल 114 चुका…उमेदवारांसाठी भूमी अभिलेख खात्याचा मोठा निर्णय

दरम्यान, परीक्षेत एकूण 5700 प्रश्न होते. आक्षेप नोंदविण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. एकूण 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. 114 प्रश्नच चुकीचे होते, म्हणजेच प्रश्न किंवा उत्तरसुची चुकलेले असे हे प्रश्न होते, त्याचे 100 टक्के गुण उमेदवारांना देण्यात येणार आहेत. उर्वरित 32 प्रश्नांच्या उत्तरसूचीमध्ये देण्यात आलेले उत्तर चुकीचे होते, त्यामुळे योग्य उत्तर देणाऱ्यांना गुण देण्याचा मोठा निर्णय भूमि अभिलेख खात्याने घेतला असल्याचे अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी सांगितले.

प्राप्त आक्षेप हरकत बाबत  (Click Here)


Share Me