News

आतापर्यंतचा ऊस दर राजू शेट्टींमुळेच; शाहू महाराजांचा चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा! Raju Shetti

कोल्हापूर | मागील हंगामातील तुटलेल्या ऊसाच्या शिल्लक 400 रुपयांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून विविध पातळीवर आंदोलन करूनही कोणतीच दखल सरकार आणि साखरसम्राटांकडून घेतली गेलेली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी हजारो शेतकऱ्यांसह आज कोल्हापुरात राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे.

आज (23 नोव्हेंबर) राजू शेट्टी यांनी सकाळी अकरा वाजल्यापासून चक्काजाम आंदोलन सुरु केल्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी (Shahu Maharaj support to Raju Shetti) आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी हायवेवर जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच शाहू महाराजांनी या आंदोलनावर आजच तोडगा काढण्याची विनंती शासन आणि संबंधितांना केली.

यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना शाहू महाराज म्हणाले की, इतर सगळ्यांच्या तुलनेत ऊसाचा दर वाढलेला नाही. गेल्या 10 ते 15 वर्षात जो दर मिळत आहे तो दर राजू शेट्टी यांच्यामुळेच मिळाला आहे. त्यामुळे ऊसादराच्या बाबतीत संबंधितांनी लवकरात लवकर दखल घेऊन निकाल लावला पाहिजे. 

चार कारखान्यांकडून मागील शिल्लकेतील 100 रुपये देण्याची तयारी 

दरम्यान, शाहू महाराज यांनी भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केल्यानंतर राजू शेट्टी यांनी आतापर्यंत चार कारखान्यांनी 100 रुपये देण्याची तयारी दाखवल्याचे सांगितले. तसेच बाकी कारखान्यांचे काय करायचं ते पाहू असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

दुसरीकडे ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीची अट घालू नका, अशी अट घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदार 100 रुपये देण्यास तयार झाले आहेत. मात्र, हायवेवर तळ ठोकलेल्या राजू शेट्टी यांनी आपला पवित्रा कायम ठेवला आहे. गेल्यावर्षीचे म्हणून 100 रुपये द्या, या भूमिकेवर राजू शेट्टी ठाम आहेत. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत महामार्ग सोडणार नसल्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी केला आहे. 

कोल्हापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गानी वळवली

दरम्यान, कोल्हापूर पोलिसांकडून आंदोलनलस्थळी तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथून तळंदगे फाटा-हातकणंगले-जयसिंगपूर-इस्लामपूर-पेठ नाका येथून पुण्याकडे जाण्यास वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापुरातून बेळगावकडे जाण्यासाठी कसबा बावडा-कोल्हापूर शहर शिवाजी विद्यापीठ मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.

Back to top button