मराठा आंदोलकांच्या धसक्याने मुख्यमंत्री शिंदेचा गुप्तपणे कोल्हापूर दौरा; ‘हा’ गुप्त दौरा नेमका कशासाठी? CM Shinde

Share Me

कोल्हापूर | जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धग संपूर्ण राज्यात पसरली आहे. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अनेकांच्या गाड्या अडवण्याचे प्रकार सुरू आहेत. कोल्हापुरातदेखील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा दोन वेळा अडवण्यात आला. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल कोल्हापुरात गुपचुप यावे लागले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) कोल्हापूरातील सिद्धगिरी मठावर आयोजित विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी रात्री (28 ऑक्टोबर 2023) आठ वाजता कोल्हापुरात आले. त्यांच्या दौऱ्याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. शासकीय विभागांकडून देखील या दौऱ्याची कोणतीच माहिती कुणालाही देण्यात आली नव्हती.

संध्याकाळी पाच वाजल्या पासून कोल्हापूर विमानतळ ते कणेरी मठापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र कोण येणार आहे हे पोलीस आणि प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले नव्हते. साधारण आठच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे कणेरी मठात दाखल झाले. त्यावेळी सुरवातीला मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ शूट करण्यापासूनही माध्यमांना अडवण्यात आले.

जरांगे पाटील यांनी प्रकरण जास्त ताणू नयेमुख्यमंत्री शिंदे

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत हे सरकार मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देणारच, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच सर्वांनी धैर्य व धीर ठेवावा. मराठा समाजाने सरकारला समजून घ्यावे तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणास बसलेल्या जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चिंता वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवून दिल्या त्या दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे. मराठा समाज मागास आहे. असे सांगत शिंदे म्हणाले, कुणबी दाखले देण्याबाबत नेमण्यात आलेली न्यायमूर्ती शिंदे समिती अत्यंत चांगले काम करत आहे.

आतापर्यंत आठ ते दहा हजार जुन्या नोंदी शोधल्या आहेत. अगदी हैदराबादमध्ये जाऊनही नोंदी तपासल्या जात आहेत. या सर्व कामाला काही अवधी लागणार आहे. यामुळे मराठा समाजाने धैर्य ठेवावे. तरुणांनी आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, तसेच जरांगे पाटील यांनी प्रकरण जास्त ताणू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मराठा आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड

दरम्यान मुख्यमंत्री कोल्हापुरात दाखल झाल्याची माहिती मराठा आंदोलकांना समजल्याने राजारामपुरी पोलीसानी सर्व मराठा आंदोलकांना त्वरित ताब्यात घेतले. मराठा आंदोलकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यातच घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी मराठा आंदोलन आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट देखील झाली. पोलिसांनी सर्वांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस ठाण्यातच ठेवलं व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं.


Share Me