News

मनोज जरांगेंच्या घोषणेने आमदारांना धडकी; विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करणार | Manoj Jarange Patil

परभणी | लोकसभेला जरी उमेदवार उभे केलेले नसले तरी विधानसभेला सर्वच्या सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. लोकसभेला कोणाला पाडा हे सांगितलेले नाही. पण त्याचा कोणी गैर अर्थ काढू नये. मी किंवा समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही. तसेच एकही अपक्ष उमेदवार उभा केलेला नाही, असे सांगत मनोज जरांगे यांनी पुढील राजकीय वाटचालीची घोषणा केली. 

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागडच्या गोरी गांधारी येथे मतदानाचा हक्क बजावला. दोन दिवसांपूर्वी जरांगे यांची प्रकृती खालावल्याने बीडहून छत्रपती संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आजारी असल्याने जरांगे मतदानासाठी अॅम्बुलन्समधून आले होते. आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. जरांगे यांच्या या घोषणेमुळे विद्यमान आमदार आणि राजकीय पक्षांना चांगलीच धडकी भरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

समाजाला आवाहन करतो की, मराठा आणि कुणबी यांच्या बाजूने असणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करावे. एखाद्याला पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे, यावेळेस पाडणारे बना. जो उमेदवार सगे सोयऱ्यांच्या बाजुचा आहे त्याला मतदान करावे, असे जरांगे म्हणाले. मराठ्यांना बरोबर माहितीय की कोणाला मतदान करावे.

आंबेडकर किंवा छत्रपतींच्या गादीचा मान राखायला हवा, असेही जरांगे यांनी सुचविले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंसमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु तो मराठा समाजाने नाकारला होता. यामुळे जरांगे यांनी लोकसभेला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. 

Back to top button