उद्यापासून राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ‘हा’ आहे अंदाज | Weather Update 30-04-2024
पुणे | राज्यातील अनेक भागात उन्हाचा पारा चंगलाच वाढला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस देखील पडत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर उद्यापासून राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल असा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर उद्या ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर जिल्ह्यात उष्ण रात्रीचा अंदाज आहे. तसेच मराठवड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी उष्ण रात्रीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच राज्याच्या बहुतांशी भागात उन्हाचा चटका कायम राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.