News

केजरीवाल यांना जामिन मिळण्याची शक्यता; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सुतोवाच | Arvind Kejriwal

नवी दिल्ली (पीटीआय) | लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अंतरिम जामीन देण्याचा विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) सांगितले. त्यामुळे केजरीवाल यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. केजरीवाल गेल्या ४३ दिवसांपासूनईडीच्या कारवाईमुळे तिहार तुरुंगात अटकेत आहेत. 

‘ईडी’ने त्यांना दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) अटक केली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आता येत्या मंगळवारी (७ मे) सुनावणी होणार आहे. अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती, मात्र ती अपूर्ण राहिली.

यानंतर होणारी ७ मे रोजीची सुनावणीही पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याचा विचार करू, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, याचा अर्थ अंतरिम जामीन मंजूर केला जाईलच किंवा दिला जाणारच नाही असा होत नाही, असेही न्यायालयाने फिर्यादी आणि बचाव पक्षांना बजावले.

‘ईडी’ची बाजू मांडणारे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता एस. व्ही. राजू यांना न्या. खन्ना म्हणाले की, ‘‘सुनावणी आज पूर्ण होईल असे दिसत नाही. त्यामुळे ती मंगळवारी सकाळी ठेवूया. जर सुनावणीला आणखी वेळ लागणार असेल तर, अर्थात तो लागेलच असे दिसते. त्यामुळे आम्ही निवडणुकीसाठी अंतरिम जामिनाचा विचार करू. आम्ही तुमचा युक्तिवाद ऐकून घेऊ, याबाबत कोणतीही शंका बाळगू नका.’’

अंतरिम जामिनाच्या शक्यतेला विरोध करताना राजू यांनी ‘आप’चे नेते संजय सिंह यांना मंजूर केलेल्या अंतरिम जामिनाचा संदर्भ दिला. ‘‘ते कशा प्रकारे विधाने करत आहेत ते पाहा’’, असे राजू म्हणाले. तसेच केजरीवाल यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केजरीवाल यांची बाजू मांडली. ‘‘केजरीवाल यांना अखेरचे समन्स १६ मार्चला आले होते, त्यामध्ये ते त्या तारखेपर्यंत संशयित किंवा आरोपी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर २१ मार्चला अटक करण्यासारखे इतके काय बदलले’’, असे सिंघवी यांनी विचारले.

अटकेसाठी लोकसभा निवडणुकांची वेळ का निवडली?

केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीने केलेल्या अटकेबद्दल खंडपीठाने यापूर्वी भाष्य केले होते आणि निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्याने म्हणजे २१ मार्च रोजीच अटकेची वेळ का साधण्यात आली, हे ईडीला स्पष्ट करावे लागेल, असेही म्हटले होते.

Back to top button