Career

एसटी महामंडळातील भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी; भरती प्रक्रिया लवकरच! MSRTC Recruitment 2025

कोल्हापूर | एसटी महामंडळातील भरतीची (MSRTC Recruitment 2025) प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील ST महामंडळामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स, पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर/पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. लवकरच 2025 मध्ये ही भरती केली जाणार असल्याची माहिती आहे.

कोल्हापूर विभागात कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, आजरा, संभाजीनगर, गारगोटी, चंदगड, कुरुंदवाड, राधानगरी, गगनबावडा व आजरा असे आगार असून, विभागातील गाड्यांची एकूण संख्या ७१७ इतकी आहे. त्यामानाने वाहक व चालकांची संख्या पूर्णपणे भरलेली नाही. शासनस्तरावर पदांच्या भरतीसाठी वेळोवेळी मागणी होऊनही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या विभागातील रिक्त पदांची भरती अद्याप झालेली नाही. प्रशासनातील मंजूर ६४३ पदांपैकी ३०७, कार्यशाळेतील १२४९ पैकी ३६६, वाहतुकीतील २८० पैकी ४२ पदे रिक्त आहेत. चालकांच्या मंजूर १९३६ पैकी ६७७, तर वाहकांच्या १९८३ पैकी ५७२ पदे रिक्त असून, या सर्वच पदांकरिता भरती प्रक्रिया राबवली नसल्याने प्रशासनावर त्याचा ताण येत आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा निश्‍चित करताना तारेवरची कसरत होत आहे. 

मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक डिझेल ॲटो इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनर, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, वेल्डर अशा विविध ३१० पदांसाठी यंदा जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ही पदे केवळ एक वर्षाच्या कालावधीसाठी असतील, असे नमूद करण्यात आले होते.

विशेष म्हणजे त्यांना महिन्याकाठी दहा हजार रुपये इतके मानधन दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ही पदे भरण्यात असली, तरी ती कायमस्वरूपी भरणे महत्त्वाचे आहे. प्रशासनातील पदांची भरती न झाल्याने त्याचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कार्यशाळा असो किंवा वाहतूक त्याची स्थिती याहून निराळी नाही.

राज्यातील अन्य विभागांशी स्पर्धा करताना कोल्हापूर विभागाला येत्या मार्च २०२५ पर्यंत पहिल्या तीन क्रमांकात येण्याचे आव्हान पेलायचे आहे. ते पेलण्यासाठी पदांची भरती होणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात येते. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी, इतकीच प्रवासी वर्गाची अपेक्षा आहे.

Back to top button