पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत मनोज जरांगेंची सडेतोड प्रतिक्रिया; म्हणाले..
पंकजा मुंडेंच्या उमेदवारीवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत असताना मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “या निर्णयाला चुकीचा निर्णय म्हणण्याचं कारण नाही आणि चांगला म्हणण्याचीही आवश्यकता नाही\”.
पंकजा मुंडेंच्या उमेदवारीबाबत मनोज जरांगे यांना विचारले असता त्यांनी, “या निर्णयाला चुकीचा निर्णय म्हणण्याचं कारण नाही आणि चांगला म्हणण्याची आवश्यकता नाही. या निर्णयामुळे आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही. आम्ही त्यावर काही नकारात्मक प्रतिक्रिया देणार नाही. कारण आम्ही काही जातीयवादी नाही. आम्ही त्यांना निवडणुकीत पाडा असं देखील म्हणालो नव्हतो. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा आमच्या समाजावर काही परिणाम होण्याचं कारण नाही. आम्ही समाज म्हणून एकत्र आहोत आणि एकजुटीने राहणार आहोत. एकजुटीने आम्ही आरक्षणासाठी लढा देणार आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळवणार आहोत.” असे स्पष्ट केले.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांना पत्रकारांनी, भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयाचं तुम्ही स्वागत करणार का? असे विचारले असता त्यांनी, “या निर्णयाचं स्वागत करणारा मी कोण आहे? मी स्वागत केल्याने किंवा न केल्याने त्यांना (पंकजा मुंडे आणि भाजपा) काही फरक पडणार आहे का? त्यांना काही फरक पडणार असेल तर मी कौतुक करेन.” अशा शब्दात आपले मत व्यक्त केले.
पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपणार
लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं पक्षाने राजकीय पुनर्वसन करावं, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास सुरू झाला होता.
भाजपाने यंदा पंकजा मुंडे यांना त्यांच्या बहिणीच्या म्हणजेच माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, पंकजा मुंडे विधानसभेपाठोपाठ लोकसभेलाही अपयशी ठरल्या. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांचा राजकीय वनवास सुरू होतोय असे दिसत असतानाच त्यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.
सध्याच्या घडीला महायुतीचं संख्याबळ पाहता भाजपाचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यानुसार भाजपानं पाच जणांना आपल्याकडून संधी दिली आहे. त्यामुळे भाजपने उमेदवारी दिलेले सर्व उमेदवार आमदार होतील अशी चिन्हे आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांचा २०१९ पासून सुरू झालेला राजकीय वनवास संपणार आहे.