विधानसभेला \’मराठ्यांची ताकद दाखवणार\’, मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं.. Manoj Jarange
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. हा मुद्दा किती महत्वाचा आहे याची जाणीव सर्वच पक्षांना झाली. येत्या विधानसभा निवडणुकीत देखील (Maharashtra Assembly Election) मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 13 जुलैपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे. तो पर्यंत तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारला आपला झटका दाखवू असा इशारा दिला आहे.
येत्या विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन राज्याचा दौरा करणार आहेत. विधानसभेसाठी संपूर्ण 288 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
\’मराठा समाजाची ताकद दाखवणार\’
जर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही ताकदीने एकजुटीने पुन्हा आपली ताकद दाखवणार, आम्ही 288 जागांवर उमेदवार उभे करणार, याबाबत 13 जुलैनंतर निर्णय घेणार, बैठक घेऊन 288 पाडायचे की निवडून आणायचे याच्यावर निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. आतापर्यंत समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे बैठक घेऊन ठरवणार आणि एकदा ठरलं की त्या मतावर आम्ही ठाम राहणार असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं. पावर गोर-गरीबांच्या हातात राहायला हवी, समाजाला विचारुन निर्णय घेण्यात येईल. पाडण्याची ताकद आणि निवडून आणायची ताकद मराठा समाजात आहे असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर ठाम मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने एक महिन्याची वेळ वाढवून मागितली होती, ती मुदत आम्ही मोठ्या मनाने दिली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी ही आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे व्हायला हवी अशी आमची प्रमुख मागणी असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. याशिवाय आठ ते नऊ मागण्या आहेत, त्यावरही सरकारबरोबर चर्चा झाली आहे.
मराठा आरक्षणासाठी रॅली
आपल्या दौऱ्याला ओबीसी समाजाने (OBC) विरोध करण्याचं काही कारण नाही. लोकशाहीत कायद्याने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. आम्ही मराठा आरक्षण (Maratha Reservation) जनजागृती रॅली सहा जुलैपासून सुरु करणार आहोत. तेरा जुलैपर्यंत ही रॅली शांतेत काढली जाणार आहे. राजकीय स्वार्थासाठी विरोध करायचा ही सवय लागली आहे अशी टीका जरांगे पाटील यांनी केली. तुमच्या लेकराला जसं आरक्षण मिळतंय, तसं आमच्याही लेकराला मिळावं ही आमची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं.
भुजबळांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत, जरांगेंचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप
सरकार भुजबळांना गप्प का बसवत नाही म्हणत मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. गावागावात तेढ निर्माण करण्याचं काम फक्त भुजबळांनी केलंय. आम्ही जिथे सभा घेतो तिथे सभा घ्यायची गरज काय?
भुजबळांनी जातीयवाद पसरवण्याचं काम केलंय ते त्यांनाच बंद करावं लागणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. भुजबळांचा विचार मराठा विरोधी आणि द्वेषाने भरलेला आहे. आंतरवालीच्या आंदोलनाची परवानगी भुजबळांच्या माध्यमातूनच नाकारली, भुजबळांना सरकार गप्प बसवत नाही तोवर ते गप्प बसणार नाहीत, भुजबळांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत असा गंभीर आरोप यावेळी मनोज जरांगे यांनी केला.