कोल्हापूर | राधानगरी धरणक्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा (Kolhapur Rain Alert) जोर कायम आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला 27 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे 2019 व 2021 साली ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते त्या नागरिकांनी तातडीने शासकीय निवारागृह किंवा आपल्या सोईने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
राजाराम बंधारा पाणी पातळी (सायंकाळी 6 वाजेपर्यंत) 40'05'' (542.51m) (इशारा पातळी 39'00'' व धोका पातळी 43'00'') सध्याचा विसर्ग - 60106 क्युसेक्स सध्या पाण्याखाली असणारे बंधारे - 81
राधानगरी धरणक्षेत्रात दुपारी चार वाजेपर्यंत 36 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या धरण 95.56 टक्के भरले आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठी 7.99 टीएमसी इतका असून खाजगी जलविद्युत केंद्रातून भोगावती नदीत 1150 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि रात्री पावसाने उसंत घेतली नाही तर धरणाचे दरवाजे पहाटेपर्यंत उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पुरस्थिती ध्यानात घेता नदीकाठच्या गावाना सावधगिरीचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.