पंचगंगा 41 फूटाकडे.., अलमट्टीतून दीड लाख क्युसेक विसर्ग, महापूराच्या परिस्थितीने यंत्रणा हाय अलर्टवर | Kolhapur Rai Update 23 July 2024
कोल्हापूर | जिल्ह्यात सुरू असणाऱ्या संततधार पावसाने (Kolhapur Rai Update) नदी नाल्यांना पुर आला आहे. जिल्ह्यातील 150 गावे पुराच्या विळख्यात सापडली असून अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी सकाळी 10 वाजताच्या रिपोर्टनुसार 40\’11\’\’ फूट इतकी आहे. धोका पातळी गाठण्यास अवघे 2 फूट शिल्लक असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदीकाठच्या बाधित गावांना सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे. नदीची धोका पातळी 43 फुटांवर आहे. हवामान विभागाने आज (दि.23) जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्याप्रमाणे पाऊस पडला तर महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. पूरप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी स्थलांतराची तयारी सुरू आहे.
Kolhapur Rai Update : दि.23/07/2024
सकाळी 10:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
40\’11\”
( 542.66m )
विसर्ग 60616* Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
एकुण पाण्याखाली बंधारे – 78
संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने पुराचा फटका बसणाऱ्या कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागात स्थलांतर मोहीम राबवली जात आहे. कोल्हापुरात 78 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून ग्रामीण भागातही स्थलांतर सुरू आहे.
कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल परिसरातील विटभट्टीजवळील 58 व सुतारवाडा येथील 20 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. पुराचं पाणी आलेल्या तावडे हॉटेल, मार्केट यार्ड, मुक्त सैनिक वसाहत, सुतारवाडा या परिसराची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली.
दरम्यान, ग्रामीण भागात कुटुंबांचे स्थलांतर केले जात आहे. पन्हाळा तालुक्यातील आवर्डे येथे दोन कुटुंबांतील 18 लोकांनी नातेवाईकांच्या घरी स्थलांतर केले आहे. पुराचा धोका असलेल्या चिखली गावातील 10 कुटुंबांनी पर्यायी ठिकाणी स्थलांतर केलेले आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली असली तरी सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. राज्यात कोकण वगळता इतरत्र देखील पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने आगामी २४ तासांत राज्यातील रेड अलर्ट कमी झाल्याचे पहायला मिळत आहेत.
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टी
गेल्या २४ तासांत कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील बहुतांश भागात २०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस घाटमाथ्यावरील धारावी २७५, ताम्हिणी २३०, तर महाबळेश्वर येथे २४१ मि.मी. इतका पाऊस झाला. कोकणातील राजापूर येथे २१० मि.मी. पाऊस झाला आहे.
आगामी पाच दिवसांतील अलर्ट (कंसात तारीख)
- रेड अलर्ट : रायगड (२४), रत्नागिरी (२३), सातारा (२३)
- ऑरेंज अलर्ट: पालघर (२४), ठाणे (२४), रायगड (२३), रत्नागिरी (२४, २५), सिंधुदुर्ग (२३, २४), पुणे (२३, २४), कोल्हापूर (२३), सातारा (२४, २५)
- येलो अलर्ट : पालघर (२५), ठाणे (२५, २६), मुंबई (२४, २५), रत्नागिरी (२६), सिंधुदुर्ग (२४.२५), नंदुरबार (२३, २४), जळगाव (२४), नाशिक (२३, २४), पुणे (२५, २६), कोल्हापूर (२४, २५), सातारा (२६), अकोला (२३ ते २६), अमरावती (२४ ते २६), भंडारा (२३ ते २६), बुलडाणा (२६), चंद्रपूर (२३ते २६), गडचिरोली (२३ ते २६), गोंदिया (२३ ते २६), नागपूर (२३ ते २६), वर्धा (२४ ते २६), वाशिम (२३ ते २६)
नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर 90 टक्के पाण्याखाली
दरम्यान नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पात्रात गेल्या २४ तासांत साधारण पाच फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळं दत्त मंदिर नव्वद टक्के पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. नदीकाठच्या शेतात देखील सर्वत्र पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अलमट्टीतून दीड लाख क्युसेकचा विसर्ग कायम
चिक्कोडी : अलमट्टी जलाशयातून सोमवारीही दीड लाख क्युसेकचा विसर्ग कायम ठेवला आहे. दोन दिवसांच्या तुलनेत धरणात पाण्याची आवक थोडीशी वाढली असली, तरी विसर्ग कायम ठेवल्याने सोमवारी कृष्णेची पातळी गतीने वाढलेली नाही. धरणात ९३ टीएमसी पाणीसाठा आहे.