News

विजेच्या तारेच्या धक्क्याने नागाव येथील शेतकऱ्याचा मृत्यु; महावितरणच्या गलथान कारभाराचा कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक बळी | Kolhapur News

कोल्हापूर | विजेच्या तारेचा धक्का लागून जिल्ह्यात अनेक लोकांचा बळी गेलाय. शाहूवाडी तालुक्यातील दोन सख्या भावांच्या मृत्युची घटना ताजी असतानाच आज हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील चेअरमन पाणंद परिसरातील शेतामध्ये उसावर औषध फवारणी करत असताना शेतावरून गेलेली तार अंगावर पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे महावितरणच्या कामकाजाविषयी रोष व्यक्त केला जात आहे.

Kolhapur News: घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुनील बापू शिंदे वय वर्ष ४३ नागाव येथील शेतामध्ये वाटेकरी म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ते शेतामध्ये ऊस पिकावर औषध फवारणी करत असताना अचानकपणे शेतावरून गेलेली तार त्यांच्या अंगावर पडली. यामुळे विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कळताच नागावचे पोलीस पाटील बाबासो पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्दी दिली. त्यानंतर तातडीने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून सी पी आर येथे पाठवण्यात आला. या घटनेची फिर्याद शरद पाटील यांनी दिली आहे.

महावितरणचे किरण तरडे हे अधिकारी कर्मचाऱ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कामकाजाविषयी रोष व्यक्त केला. घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या आकस्मिक घटनेमुळे नागावसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button