खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील विशाळगडाकडे रवाना; 19 जुलैला एमआयएमचा कोल्हापुरात मोर्चा | Vishalgad Disputes
कोल्हापूर | गेल्या तीन-चार दिवसांपासून विशाळगड अतिक्रमण मुक्ती मोहिम राज्यभर गाजत आहे. यावेळी झालेल्या हिंसाचाराबाबत आणि अतिक्रमण मुक्ती कारवाईबाबत कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
विशाळगडावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराज विशाळगडाकडे रवाना झाले आहेत. यावेळी ते विशाळगडावर आणि पायथ्याला झालेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहेत. शाहू महाराज यांच्यासोबत काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि इंडिया आघाडीचे नेते देखील विशाळगडच्या दिशेने रवाना झाले आहेत.
विशाळगडावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने विशाळगडावर ज्या ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्यांना मदत केली जाणार आहे. सरकार कधी मदत करेल काही माहित नाही, मात्र सामाजिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही मदत घेऊन जाणार आहोत असं आमदार सतेज पाटील यांनी याबाबत काल सांगितले होते.
विशाळगडावर पुण्यातील काही लोक येऊन त्यांनी हा हिंसाचार केल्याचा आरोपही सतेज पाटील यांनी केला होता. पुण्यातले लोक कोल्हापुरात येतात काय आणि ही दंगल होते काय, असे प्रकार घडत असताना पोलिस अधीक्षकांनी बघ्याची भूमिका घेतली. ज्या दिवसापासून पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित या जिल्ह्यात आले आहेत तेव्हापासून कोल्हापुरात अशा घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांना शासनाने परत बोलवावं, तरच या घटना थांबतील, अशी मागणीही सतेज पाटील यांनी यावेळी केली होती.
खासदार शाहू महाराजांकडून विशाळगडावरील घटनेचा निषेध
विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान झालेला हिंसाचार प्रचंड वेदनादायी असून आम्ही त्याचा निषेध करतो असे शाहू महाराजांनी म्हटले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना होते हे अत्यंत क्लेशदायक आहे. यासंदर्भात प्रशासनाने माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांना घटनेपूर्वीच दिल्या होत्या. परंतु ते गांभीर्याने घेण्यात आलं नाही. त्यानंतर ही घटना घडली, हे प्रशासनाचे अपयश आहे, असेही शाहू महाराजांनी म्हटले आहे.
हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले त्याना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सरकारने काही केलं नाही तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल, असेही शाहू महाराजांनी स्पष्ट केले आहे.
विशाळगड प्रकरणात काँग्रेसची उडी
कोल्हापूर विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस आमदार अस्लम शेख व अमिन पटेल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची आज दुपारी 12 वाजता भेट घेणार आहेत.
19 जुलैला कोल्हापुरात एमआयएम मोर्चा काढणार
विशाळगडाच्या परिसरात झालेल्या कारवाईविरोधात आता एमआयएम पक्ष आक्रमक झाला आहे. 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएमकडून मोर्चा काढला जाणार आहे. त्यासाठी राज्यभरातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी 19 जुलैला कोल्हापूरात धडकणार आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडून फेसबुकवरून कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.