मुंबई | भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा (IMD Rain Alert) दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ दिला आहे.
मुंबईसह पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, ठाणे, पालघर, नाशिक, वर्धा आणि यवतमाळ या नऊ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, पुढील पाच दिवस राज्याच्या बहुतेक भागात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला (IMD Rain Alert) आहे.
हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाऊस पडण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील पाच दिवस राज्याच्या बहुतेक भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईपासून केरळच्या संपूर्ण किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली आहे. त्यामुळे राज्यासह दक्षिण भारतातही पुढील चार दिवस चांगला पाऊस होण्याचा अंदाज असल्याचे होसाळीकर यांनी स्पष्ट केले.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात बहुतेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुधवारी सायंकाळी संपलेल्या नऊ तासांत राज्यात सर्वाधिक ३६ मिमी पाऊस अकोल्यात झाला आहे. त्या खालोखाल यवतमाळमध्ये २ मिमी, औरंगाबादमध्ये १३ मिमी, महाबळेश्वरमध्ये ७ मिमी, पुण्यात ३ मिमी, अलिबागमध्ये १० मिमी, डहाणूत ३ मिमी, कुलाब्यात ५ मिमी, आणि रत्नागिरीत ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्हा पाऊस (6 जुलै) : कागल – 10, गारगोटी – 10, हातकणंगले – 3, राधानगरी – 38, आजरा – 32, शिरोळ – 5, शाहूवाडी – 25, पन्हाळा – 19, गगनबावडा – 116 (सर्व आकडे मिलीमीटर मध्ये)