पुणे | महाराष्ट्र व केरळ किनारपट्टीवर गेल्या पाच दिवसांपासून ढगांची गर्दी सुरू आहे. किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तिकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात येत आहेत. परिणामी कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर पहायला मिळत आहे.
हवामान विभागाने केरळ, कर्नाटक सह महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीचा (IMD Rain Alert) इशारा दिला आहे. केरळ, कर्नाटक राज्यात आज-उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात कोकण व घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात 5ते7 जुलै तर मध्य महाराष्ट्रात 6 व 7 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
- आज कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
- या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- पुणे आणि ठाण्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
- 5 जुलैपासून पुढील 3 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
- पुण्यातही पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्याच्या विविध भागात पाऊसाने चांगली हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (IMD Rain Alert)
मान्सूनची देशभर हजेरी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. दरवर्षी साधारणपणे संपूर्ण भारतात 8 जुलैच्या आसपास मान्सून दाखल होतो. पण यावर्षी मात्र आधीच संपूर्ण देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनने रविवारी संपूर्ण देश व्यापल्याने पश्चिमी वार्यांना बळकटी मिळाली आहे. त्यामुळे देशभर जोरदार पाऊस सुरू असून, गुजरातमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. हिमालयासह पश्चिम बंगाल भागात अतिवृष्टी सुरू आहे. गुजरातमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने तेथेही अतिवृष्टी सुरूच आहे.
उत्तर भारतातही जोरदार पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतातही जोरदार पाऊस सुरु आहे. देशाची राजधानी दिल्लीतही चांगला पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे काही ठिकाणी मात्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.