मुंबई | बंगालच्या उपसागरात कमी दाब प्रणाली तयार झाली आहे. ही दाब प्रणाली वायव्य दिशेला सरकत असल्याने पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD Rain Alert) वर्तवली आहे. तसेच या काळात मध्य भारतातील काही भाग, कोकण गोवा किनारा, घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हणटले आहे.
हवामान विभागाने मुंबई आणि पुण्यात आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ठाणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली येथे पूरस्थिती उद्भवल्यानंतर आता पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज गुरुवार, 27 जुलैला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ दिला आहे. तर नागपूरसह भंडारा, गोंदिया व यवतमाळ या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने मुंबईला काल रात्री 8 ते आज दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी सुटी जाहीर केली आहे.