ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी वेळेवर भरा, अन्यथा होईल कारवाई? म्हणूनच जाणून घ्या काय आहेत याचे नियम.. Grampanchayat

ग्रामपंचायत ही राज्य व्यवस्थेचा पाया आहे. ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीला (Grampanchayat) शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरीही तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेकदा कर वसूली नसेल तर ग्रामपंचायतींना आर्थिक अडचणी येतात.

ग्रामपंचायतीच्या पट्ट्या भरणे, तसेच काही कर असल्यास ते भरणे हे कोणत्याही सुजान नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतू, अनेकजण तसे करताना दिसत नाही. वर्षोनुवर्षे पाणीपट्टी, घरपट्टी सारखे कर थकवले जातात. परंतू, हे कर चुकवणाऱ्या किंवा वेळेवर भरणा न करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची सुचना आहे. याचे कारण तुम्ही जर ग्रामपंचायतीच्या कराचा भरणा केला नाही तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते.

ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असून, गावातील विकासकामांसाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध असल्यास कोणतीही कामे प्रलंबित राहत नाहीत. गावकऱ्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येकांनी पाणीपट्टी, घरपट्टी वेळेत भरणे जरुरी आहे.
– इशाद्दीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

कर न भरल्यास दाखले देण्यास अडवणूक करता येते का?

गावातील एखाद्या मिळकतदाराने पाणीपट्टी किंवा घरपट्टी भरलेली नाही म्हणून त्याला शासकीय योजनांचा लाभ न देणे, उतारा किंवा इतर दाखला न देणे, असे कोणत्याही नियमात नाही. नागरिकांनी दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांनी (ग्रामसेवक) त्याला तो दाखला देणे बंधनकारक आहे. तरीपण, आपल्या गावाच्या विकासाला हातभार लागावा, यासाठी कर वेळेत भरावा, असे अपेक्षित आहे. दुसरीकडे ग्रामपंचायत कायद्याअंतर्गत थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.

कर न भरल्यामुळे एक तर आपली कराची रक्कम वाढत जाते, त्यावरील अतिरिक्त दंडही भरावा लागतो, आणि जप्तीसुद्धा होऊ शकते, आणि एव्हढे होऊनही शेवटी कराची रक्कम भरावीच लागते. त्यापेक्षा जर आपण आपला कर दरवर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात भरला तर आपल्याला घरपट्टीच्या चालू रकमेवर 5% सूट सुद्धा मिळते. मार्चपर्यंत भरला तर दंडही लागत नाही आणि आपण ग्रामपंचायतला कधीही कुठल्याही कामासाठी गेलो तरी कुणी आपल्याला कर भरा म्हणून तगादाही लावणार नाही.

गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर,व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे. कराच्या रूपाने ग्रामस्थ ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्ट्या बळकट करत असतात आणि त्यातूनच एका सक्षम गावाची निर्मिती होत असते.

Exit mobile version