News

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन; भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला! Dr. Manmohan Singh

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनामुळं जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनमोहन सिंह यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी एम्स रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होत. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हाच समोर आली होती.

 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही.  त्यानंतर 2009 साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.

डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान सिंह कुटूंब विस्थापित होऊन भारतात आले. त्यानंतर मनमोहन सिंह यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. 

सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं. त्यानंतर 1985 ते 1987 या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून भुमिका निभावली.

सन 1991 सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. 

सन 1996 साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.

पंतप्रधान मोदींकडून सिंह यांच्या कुटुंबियांची विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांच्या कुटुंबियांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच अनेक दिग्गज नेतेही एम्स रुग्णालयात दाखल होत आहेत. पोलिसांकडून आता दिल्लीतील एम्स रुग्णालयाचा परिसर मोकळा करण्याचं काम सुरु झालं आहे.

काँग्रेसची बेळगावमधील सभा रद्द, राहुल गांधी दिल्लीला रवाना

काँग्रेसची उद्या बेळगावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावात गेले होते. पण मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Back to top button