धोतरातला शेतकरी बघून मॉलवाल्यानं अडवलं, शेतकऱ्यांनं चक्क सात दिवस मॉल बंद पाडून आपली पावरच दाखवली.. वाचा नेमकं काय घडलं!
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धोतर घातलेल्या शेतकऱ्याला प्रसिध्द असलेल्या जीटी मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आलाय. पोरानं बापाला चित्रपट दाखवण्यासाठी तिकिट बूक केलं होतं. पण मॉलमध्ये पोहचल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्यांना प्रवेशच नाकारला.
शेतकऱ्यानं धोतर घातल्यानं त्याला मॉलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सगळीकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. व्हीडीओ व्हायरल होताच शेतकऱ्यांचं समर्थ करणाऱ्या काही कन्नड संघटनांनी मॉलमध्ये आंदोलन केलं. तसचं मॉलच्या मॅनेजमेंटला यासंदर्भात जाब विचारत शेतकऱ्याची माफी मागायला भाग पाडलं. ही माहिती समोर आल्यानंतर कर्नाटकातील सिध्दरामय्या सरकारनं या मॉलवर कारवाई करत संबंधित मॉल सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा आदेश दिला.
नेमकं झालं काय?
पेशानं शेतकरी असणारे नागराजप्पा आपल्या मुलासह जीटी मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडं चित्रपटाची आगाऊ बुक केलेली तिकीटही होती. मात्र मॉलमध्ये प्रवेश करतानाच त्यांना इंट्री गेटवर त्यांचा पारंपारिक पोषाख पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यानं रोखून धरलं. धोतर घातल्याच कारण देत सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्यांना चित्रपट पाहण्यात आत जाण्यास मज्जाव केला.
यावेळी नागराजप्पा आणि त्यांच्या मुलानं आपल्याकडील तिकिटं दाखवत, आतमध्ये सोडण्याची विनंती केली. पण उपस्थित असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यानं उध्दटपणाकरत शेतकऱ्यांला आणि त्याच्या मुलाला अपमानजनक वागणूक दिली. तसेच ही घटना वरिष्ठांच्या कानावर घालत त्यांच्याकडूनही अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रयत्न केला गेला. ही घटना घडत असताना याचा व्हीडीओ उपस्थितांनी शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. याची माहिती मिळताच कन्नड संघटनांमधील सदस्यांनी मॉलच्या समोर धोतर घालून या घटनेचा विरोध दर्शवला. प्रकरण अधिक गंभीर झाल्यानंतर मॉलमध्ये पोलिस तैनात करण्यात आले.
मॉल मॅनेजमेंटकडून माफीनामा, शेतकऱ्याचा शाल देऊन सत्कार
मॉलमधील कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या वागणुकीविरोधात अनेक शेतकऱ्यांनी आणि संघटनांनी आंदोलन सूरू केल्यानं मॉल मॅनेजमेंटला याप्रकरणाबाबात माफी मागण्यास भाग पडलं. मॉलविरोधातील आंदोलन तीव्र होत असल्याचं पाहून मॉलमधील मॅनेजमेंटकडून त्या शेतकऱ्याला बोलवून त्यांची माफी मागण्यात आली. तसंच झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत मॉल मॅनेजमेंटकडून शेतकऱ्याला शाल-श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं.
सुरक्षा कर्मचाऱ्याकडून स्पष्टीकरण
वाढता विरोध पाहिल्यानंतर मॉलमधील मॅनेजमेंटकडून शेतकऱ्याची माफी मागितलीच. त्याशिवाय प्रवेश नाकारणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यानेही या प्रकरणाबाबात स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला की, ज्यावेळी शेतकरी मॉलमध्ये आला, त्यावेळी धोतर त्यानं वरती घेतलं होतं. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या महिलांनी याबाबत तक्रार केली होती. त्याबाबत कारवाई करत त्यांना प्रवेश नाकारला होता. दरम्यान, नागराजप्पा यांच्या मुलाने असा दावा केला की, आम्ही ज्यावेळी मॉलमध्ये जात होतो, त्यावेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आम्हाला जाण्यास मज्जाव केला होता. आम्हाला आतमध्ये जाऊच दिले नव्हते. त्यामुळं सुरक्षा कर्मचाऱ्यानं केलेला दावा निव्वळ मॉलची बाजू मांडण्यासाठी केल्याचा आरोप यामुळं होत आहे.