मुंबई | मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर सुप्रीम कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढत गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सुप्रीम कोर्टावरच टीका केली होती.
काय म्हणाले भातखळकर वाचा..

अतुल भातखळकर यांच्या या विधानावर लोकांच्या प्रतिक्रिया पहा..


भातखळकर यांचं ट्वीट पाहून काँग्रेसने यावर संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ आमदार यशोमती ठाकूर यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार यशोमती ठाकूर अतुल भातखळकर यांना उद्देशून म्हणाल्या, अतुलदादा त्या ठिकाणी तुझी बहीण असती तर? तुझी बायको अथवा तुझी आई तिथे असती तर..? तरीसुद्धा तू असंच बोलला असतास का रे दादा? दादा आहेस ना तू, अरे दादा! राजकारण राजकारणाच्या ठिकाणी रे बाबा.., थोडी तरी संवेदनशीलता आहे की नाही? तुम्हाला (भाजपा) राजकारण करायच्या काही मर्यादा आहेत की नाही? तुम्ही कशातही राजकारण करता? या गोष्टीचा (भातखळकर यांच्या वक्तव्याचा) निषेध आहे.
काय आहे मणिपूरमधील घटना?
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असतानाच दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरून धिंड काढल्याच्या घटनेने देशात खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. यावर सर्वोच्च न्यायालयानेही संताप व्यक्त केला.
खरेतर, ही घटना दोन महिन्यांपूर्वीची आहे, परंतु मणिपूरमधील पोलीस प्रशासनाने याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेत केंद्राला आणि मणिपूर सरकारला गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला.
लोकांचा वाढता संताप आणि सरन्यायाधीशांनी खडसावल्यानंतर मणिपूरमधील प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. याप्रकरणी तपासही सुरू झाला. परंतु, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या या भूमिकेवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत मुर्दाडपणाची सीमारेषा ओलांडली. भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयावर केलेल्या टिप्पणी मुळे आता त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.