बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला काल मकोका कायद्यांतर्गत कारवाईनंतर आज बीड जिल्हा न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे 22 तारखेपर्यंत कराड पोलीस कोठडीत राहणार आहे.
एसआयटीने आज वाल्मिक कराडला (Walmik karad) कोर्टात हजर केले असता महत्त्वाची माहिती दिली. खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगत खंडणी प्रकरणामुळेच ही हत्या झाल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. अवादा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या खंडणीला अडथळा ठरत असल्यानेच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने (SIT) न्यायालयात माहिती देताना सांगितले. याप्रकरणाच्या अधिक तपासासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याने आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली. त्यानुसार, वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
खंडणी प्रकरण आणि हत्येचा संबंध
एसआयटीने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, अवादा कंपनीकडून मागितलेल्या खंडणीला संतोष देशमुख अडथळा ठरत होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपींनी 9 डिसेंबर 2024 रोजी देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
एसआयटीचे सात महत्त्वपूर्ण दावे:
एसआयटीचे कोर्टात 7 दावे
1. 9 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला. याकाळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मिक कराड यांचे घटनेच्या अगोदर, नंतर का घटनेदरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआरवरुन दिसत आहेत.
2. 29 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्वी ऑक्टोबर महिन्यात सुदर्शन घुले याने सदर कंपनीचे काम बंद पाडले होते.
3. अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेकवेळा परळी येथील कार्यालयात बोलवून आरोपी वाल्मिक कराडने दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती, आणि न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती.
4. 29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने विष्णू चाटे याच्या फोनवरुन सुनिल शिंदे यांना फोन करुन काम बंद करण्याची व सुदर्शन म्हणतो त्याप्रमाणे करण्याची धमकी दिली होती.
5. त्याचदिवशी सुदर्शनने अवादा कंपनी येथे जाऊन वाल्मिक कराड यांची डिमांड पूर्ण करण्याची नाहीतर काम बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींच्या मागण्या पूर्ण न झाल्याने दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदारांनी पुन्हा अवादा कपंनी येथे जाऊन तेथील गार्ड व शिवाजी थोपटे यांना मारहाण, शिवीगाळ व धमकी दिली होती.
6. त्यादिवशी मयत संतोष देशमुख व गावकऱ्यांनी विरोध केल्यावरुन 9 डिसेंबर 2024 रोजी खंडणीला अडथळा ठरणाऱ्या मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला आहे.
7. दरम्यान, वरील सर्व घटना होत असतानाच्या काळात आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचे सीडीआरवरुन दिसून येत आहे.
पोलीस कोठडी मागणीमागील कारणे:
एसआयटीने वाल्मिक कराडची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने 7 दिवसांची कोठडी मंजूर केली. या कालावधीत आरोपींच्या कॉल डिटेल्सची तपासणी, त्यांचे आरोप अन्य आरोपींसोबत जुळवून पाहणे आणि हत्या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे उद्दिष्ट आहे.