मुंबई | मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे काय? असा सवाल करतानाच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रचंड संताप व्यक्त करत ही मागणी केली आहे.
सदावर्ते यांच्या घराच्या पार्किंगमध्ये वाहनांची तोडफोड झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी वाहनांची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली. हीच का मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या? झेपणार नाही आणि पेलणार नाही असं मनोज जरांगे म्हणत होते. ते हेच आहे काय? असा सवाल करतानाच मला कोणीच शांत करू शकणार नाही, असा इशाराही गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
जरांगेंचे लाड थांबवा – सदावर्तेंची मागणी
माझ्या घरासमोर येऊन काही लोकांनी रेकी केली होती. एका चॅनलने हे दाखवले. हे षडयंत्र आहे. मी थांबणार नाही. मी विद्यापीठ आणि कॉलेजात जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. माझे सरकारला म्हणणं आहे, एकट्या जरांगेंचे ऐकू नका. आमचंही ऐका. जरांगेचे लाड थांबवले नाही तर मीही प्राणांतिक उपोषण करेल. पाणी घेऊन उपोषण होत नाही. सलाईन लावून उपोषण होत नाही, असा टोलाही त्यांनी जरांगे पाटील यांना लगावला. या प्रकरणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.