News

Ajit Pawar: कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर माझं नाव सांगा; अजितदादांनी शेतकऱ्यांना असं का सांगितल?

कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर माझं नाव सांगा असे सांगत अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वीज बील न भरण्याबाबत आश्वस्त केलं. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचं वीजबिल भरावं लागणार नाही. एवढंच नव्हे तर आतापर्यंत थकबाकी असलेले वीज बिल देखील भरण्याची गरज नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे यापुढे शेतकऱ्यांना वीजेसाठी अवलंबून राहावे लागणार नाही. सौरउर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौरपंपाचा वापर करुन आता शेतीला पाणी देता येईल. याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे, असा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. ते गुरुवारी दिंडोरी येथे जनसन्मान यात्रेच्या व्यासपीठावर बोलत होते. 

मी 10 वर्षे राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे, मी 10 अर्थसंकल्प मांडले आहेत. त्यामुळे कुठे बचत करुन योजनेला पैसे देता येतात, हे मला माहिती आहे. विरोधक म्हणतात की, लाडकी बहीण योजना औटघटकेची आहे. मात्र, पुढील पाच वर्षे ही योजना सुरु राहील, हा अजितदादाचा वादा आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 17 ऑगस्टला मिळणार: अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी उशीर होत आहे. पण महिलांना त्यांचा हक्क मिळेल. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. आमचा प्रयत्न आहे की, 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करावेत.

आतापर्यंत सव्वा कोटी महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, 17 तारखेपर्यंत हा आकडा दीड ते दोन कोटींवर जाईल. कालच मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आलोय. ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या पैशातून तुमच्या स्वत:साठी काहीतरी घ्या. लाडक्या बहि‍णींनी पैसे खर्च केल्यास बाजारपेठेला उठाव मिळेल, असा दावा अजित पवार यांनी केला.

Back to top button